आम्ही २००९ साली अक्कलकोट वारी सुरु केली होती. आमच्यातील अनेकजण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असल्याने त्यानंतर सतत सात वर्ष आमची वारी सुरु राहिली. पण या संपूर्ण वाऱ्यांमधील आमच्या सगळ्यांच्या लक्षात राहिले आणि वारीच्या पहिल्याच वेळी अनुभवाला एक प्रसंग इथे नमूद करतोय. प्रसंग वाचून तुमच्या मनात ‘मी अंधश्रद्धाळू आहे’ इत्यादी गोष्टी येण्याची शक्यता आहे. पण मी आधीच नमूद करतो की मी जसे संपूर्ण विश्वाला चालवणाऱ्या शक्तीमध्ये (ज्याला आपल्यातील काही लोक देव म्हणतात) विश्वास ठेवतो तसेच मी निसर्गाच्या अदृश्य शक्ती मध्ये देखील विश्वास ठेवतो. त्यामुळे या प्रसंगाकडे कोणी कसे पाहावे हे मी आपल्यावर सोडतो आणि जे प्रत्यक्ष अनुभवले ते मांडतो.
समर्थ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही सगळे जवळच असलेल्या छोट्या टेकडीवरील ‘हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गा’ पाहण्यासाठी गेलो. दर्ग्याचा परिसर खूप साधा आणि मन प्रसन्न करणारा आहे. त्यामुळे तिथेच एका शेडखाली आम्ही थोडावेळ बसलो. दर्गा पाहण्यासाठी एक कुटुंब आलं होतं. तिशी-पस्तीशीच्या आसपास दिसणारी दोन जोडपी आणि एक ज्येष्ठ व्यक्ती असे पाच जण ते होते. आपल्या नेहमीच्या पोशाखात ते होते पण जोडप्यांतील पुरुषांच्या डोक्यावर मात्र शिवलिंगावर असतं तसं भस्म लावलं होतं. बहुदा ते कानडी ब्राह्मण असावेत. त्यांनी दर्ग्यात प्रवेश करताच त्यातील एक बाई एखादं झाड सरळसोट पडावं तशी पडली. आम्हाल वाटलं की तिला चक्कर आलीय म्हणून आम्ही काही जण पुढे सरसावलो. पण पुढील सगळा प्रकार चमत्कारिक होता.
तिच्या नवऱ्याने तिला उचलले आणि उभे करण्याचा प्रयत्न केला पण बेशुद्धीत असल्यासारखा तिचा तोल जात होता आणि त्यामुळे ती पुन्हा पडत होती. तिला दोघा-तिघांनी धरून शेडमध्ये आणले. थोडी शांत झाल्यावर ती काहीतरी बडबडू लागली. काय बोलतेय कळत नव्हते. हळूहळू ती उभी राहिली आणि उठ-बस करू लागली. मी एक वर्ष एका मुस्लीम कंपनीमध्ये काढले असल्याने मला लगेच कळून आले की ती बाई चक्क नमाज पढत होती. डोके सुन्न झाले. एक ब्राह्मण बाई जिने कधी नमाज पाहिला पण नसेल ती नमाज पढत होती. त्यामुळे तिने जमलेल्या आमच्यामध्ये थोडी गडबड सुरु झाली. ते ऐकून दर्ग्यामधला मौलवी बाबा बाहेर आला. त्या बाईकडे पाहून त्याने इशाऱ्याने ‘सोबत कोण आहे’ असे विचारले. तिचा नवरा पुढे आला. ‘इससे पेहले ऐसा कभी हुआ है क्या?’ बाबाने विचारले. नवऱ्याने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर त्या बाबाने तिला दर्ग्याच्या दरवाज्यासमोर आणायला सांगितले जिथे आम्ही बसलो होतो. मग हातातला मोरपंखी झाडू तिच्यासमोर धरून ते काहीतरी बडबडले. ती शांत झाली. त्याच झाडूने बाबांनी तिच्या डोक्यावर आणि पाठीवर काही दणके मारले. आणि काही वेळात बेशुद्धीतून बाहेर यावं तशी ती जागी झाली. बाबांनी त्या सगळ्यांना दर्ग्यात बोलावलं. आत कोण्या पिराची समाधी होती. तिथे सगळेच गेलो. बाबांनी तिथे काही ‘आयत’ पढल्या. दर्ग्याचा गाभाऱ्यात त्यांचा आवाज घुमला तो आम्हाला ऐकू आला. थोड्यावेळाने ते सगळे बाहेर आले. बाई आता बरीच ‘नॉर्मल’ झाली होती. बाबा म्हणाले ‘आता अजिबात वेळ वाया घालवू नका आणि तिला गाणगापूरला घेऊन जा. तिथेच याचा जालीम इलाज होईल..’ ते कुटुंब तत्काळ निघालं. झाला प्रकार इतका अनपेक्षित होता की आम्ही थोडावेळ तिथेच थांबलो. थाऱ्यावर आल्यावर बाहेर गाडीत जाऊन बसलो आणि मग पुढल्या प्रवासाला लागलो.
No comments:
Post a Comment