जिथे रस्ता, तिथे एस.टी. - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 1, 2014

जिथे रस्ता, तिथे एस.टी.


महाराष्ट्रच नव्हे तर भारतातल्या अनेक राज्यांत, काही ठराविक शहरे सोडली तर आजही अनेक गावे दुर्गम आहेत. या गावांना जोडणारा रस्ता नावापुरता रस्ता आहे. काही दुर्गम खेड्यातील लोकांना महत्वाचे जिन्नस आणण्यासाठीही कित्येक किलोमीटर दूरवर असणाऱ्या गावात जावे लागते. शाळा, बाजारहाट, औषधोपचार यांसारख्या मुलभूत सुविधांसाठीही खेड्यातील लोकांना कित्येक मैल तुडवावे लागतात. अशा परिस्थितीत पर्यटनासाठीच्या वाहतूक व्यवस्थेचा विचारच नको. मात्र दुर्गमातल्या दुर्गम ठिकाणीही लोकांच्या सोयीसाठी ठराविक वेळांसाठी का होईना परंतु ‘महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळा’च्या बसगाड्या (स्टेट ट्रान्सपोर्ट उर्फ एस.टी.) उपलब्ध आहेत. ‘जिथे रस्ता, तिथे एस.टी.’ हे घोषवाक्य सार्थ करत एस.टी. मार्गक्रमण करत आहे.

१९२० सालच्या सुमारास अनेक उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केली होती. त्यामुळे हेवेदावे आणि अनियंत्रित भाडेवाढ यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोटार वाहन अधिनियम (The Motar Vehicle Act) १९३९ अस्तित्वात आणला गेला. कायद्याने खाजगी वाहतूक व्यावसायिकांची संघटना तयार करण्यात आली. यामुळे समस्यांवर नियंत्रण आलेच पण प्रवाशांसाठी खूप सोयी निर्माण झाल्या. ठराविक थांबे, वेळापत्रक, निश्चित भाडे इत्यादी सुविधांमुळे प्रवास सुकर होऊ लागला. यानंतर १९४८ साली, गृहमंत्री कै. श्री. मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. १९४७ साली भारत स्वतंत्र राष्ट्र घोषित झाले आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९४८ साली पहिली, चंदेरी छताची निळी बस पुणे ते अहमदनगर जिल्ह्यांदरम्यान धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या. त्यानंतर १९५० मध्ये, मॉरिस कमर्शिअल कंपनीच्या, दोन आरामदायी सुविधा असणाऱ्या बसगाड्या चालवण्यात आल्या. त्या ‘नीलकमल’ आणि ‘गिर्यारोहिणी’ नावाने प्रसिद्ध होत्या. पुणे ते महाबळेश्वर मार्गावर या गाड्या धावत. ते दोन दोन आसनांच्या रांगा, पडदे, अंतर्गत सजावट, घड्याळ आणि हिरव्या रंगाच्या काचा असा या गाड्यांचा थाट होता.


1950 मध्ये, रस्ता परिवहन महामंडळ कायदा केंद्र शासनातर्फे लागू केला गेला आणि केंद्र सरकारकडून एक तृतीयांश योगदान घेऊन, वैयक्तिक रस्ता वाहतूक कंपन्या स्थापन करण्यासाठी राज्यांना अधिकार देण्यात आला. त्यानुसार मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळ (BSRTC) ची स्थापन झाली, जी आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नावाने ओळखण्यात येते. त्यानंतर एस.टी.तर्फे केवळ प्रवासीच नव्हे तर टपाल, औषधे, वर्तमानपत्रे आणि अगदी मोठ्या शहरांत शिकणाऱ्या मुलांचे डबे पोहोचवण्याचे काम होऊ लागले. ग्रामीण भागात, शेतकऱ्यांची उत्पादने शहरांत वाहतूक करण्यासाठी एस.टी. मदत करू लागली. वाईट रस्ते, सततचा तोटा, वाढते कर या सर्वांचा सामना करत एस.टी.ची वाहतूक सेवा सुरु आहे कारण ‘जनसामान्यांची वाहतूक सेवा’ ही ओळख राखून ठेवण्यातच एस.टी. समाधानी आहे.


सुरुवातीचे साधारण दोन वर्षे एस.टी.ला लोकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, हे आज कोणाला सांगितले तर पटणार नाही. त्यानंतर मात्र आजतागायत जवळपास १६००० पेक्षा जास्त बसगाड्या आणि १२००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे पालनपोषण करण्याऱ्या एस.टी.ने दररोज प्रवास करणारे राज्यभरात ७० लाखांपेक्षा जास्त प्रवासी आहेत. या आकड्यांवरून गेल्या ६३ वर्षांत एस.टी.ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे हे स्पष्ट होते. काहीही असलं तरीही, कितीही वाईट रस्ता असला तरीही, एस.टी. खरोखर रस्ता जाणाऱ्या प्रत्येक गावापर्यंत आपल्याला पोहोचवते कारण ‘जिथे रस्ता, तिथे एस.टी.’ ह्या बोधवाक्याशी ती प्रामाणिक आहे.


तर आपल्यासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या ह्या वाहतूक सेवेसाठी आपण काय केलं पाहिजे? तर शक्य असेल तेवढं खाजगी वाहतूक टाळून एस.टी.ने प्रवास केला पाहिजे. आज एस.टी. मध्ये अनेक वर्गांच्या प्रवाश्यांसाठी उत्तमोत्तम पर्याय, जसे परिवर्तन (साधी), आरामदायक (सेमी लक्झरी), शिवनेरी (ए.सी.) इत्यादी., उपलब्ध आहेत. यामुळे खाजगी वाहतूक वाहनांमुळे होणारी रहदारी कमी होईलच पण अमुल्य अश्या पेट्रोल आणि डीझेल इत्यादी इंधनांची बचतही होईल. यासोबतच आपली एस.टी.ही नफ्यात येण्यास मदत होईल ज्यामुळे आपल्याला तिच्याकडून अधिक सुविधा उपलब्ध करून घेता येईल. म्हणून चला, आपण सगळेच आज पण करूया की, ‘वाट पाहीन, पण एस.टी.नेच जाईन’..


No comments:

Post a Comment