महाराष्ट्र - स्वतःमध्ये एक संपूर्ण राष्ट्र होवू शकेल अशी टाकत असणारे भारतातील एकमेव राज्य. पूर्वी 'दंडकारण्य' म्हणून प्रसिद्ध असलेला, 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' ह्या काव्यपंक्ती अतिशयोक्ती वाटणार नाहीत, असे सत्यात राकट आणि कणखर असणारा माझा महाराष्ट्र जगातील एक प्रसिद्ध प्रदेश आहे. 'दिल्लीचेही तख्त' राखणारा माझा महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी अलंकृत आहे. पूर्वी दैवी आणि मौल्यवान वास्तूंचे, वस्तूंचे रक्षण करण्यासाठी नागदेवता प्रत्यक्ष त्यांवर पहारा देत असे; त्याचप्रकारे आपल्या मौल्यवान महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी खुद्द भगवान शिवाने नागदेवतेला सह्याद्रीच्या रूपाने पृथ्वीतलावर अवतार घेण्यास आज्ञा केल्यासारखे वाटते. अनादी काळापासून सह्याद्रीसुद्धा त्याचे रक्षणकार्य अविरत सुरु ठेवून आहे. निख्खळ कातळ असणारा सह्याद्री अजूनही एवढा रौद्र आहे कि पर्वतराज हिमालयातील पुष्कळ शिखरे सर आतापर्यंत सर झाली आहेत परंतु सह्याद्रीतील काही शिखरांकडे पाहतानाही मातब्बर गिर्यारोहींची, प्रस्तरारोहींची छाती दडपते. माझा
लोक म्हणतात 'काय आहे या महाराष्ट्रात?'.. मी प्रत्युत्तर करतो 'काय नाही या महाराष्ट्रात?'. ३.०८ लाख वर्ग किलोमीटर क्षेत्र सामावून घेणारा, पश्चिमेला अरब महासागर तर पूर्वेला गुजरात राज्यापासून सुरु होवून ते अगदी भारताचे दक्षिण टोक असणाऱ्या कन्याकुमारीपर्यंत पसरलेला राकट सह्याद्री असणारा महाराष्ट्रा भारतातील क्रमांक तीनवर असलेला प्रचंड प्रदेश म्हणून ओळखला जातो. 'दगडांचा देश' असणाऱ्या महाराष्ट्राने जगाला छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवा, सरखेल कान्होजी आंग्रे, नरवीर तानाजी, निधडे बाजीप्रभू देशपांडे, वीर मुरार बाजी, जीवा महाला, संताजी-धनाजी इत्यादी अनेक रत्ने सुद्धा दिली. कोंकण आणि देश यांसारखे समृद्ध प्रदेश, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसारखी नैसर्गिक बंदरे, अतिउष्ण नागपूर तर थंडगार नाशिक, पंढरपूर, अष्टविनायक यांसारखी तीर्थस्थळे, शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे पोलादी स्थंभ असणारे बळीवंत गड-कोट, अजिंठा, वेरूळ, घारापुरी यांसारखी नक्षीदार लेणी, कित्येक किलोमीटर्स लांबीचा समृद्ध कोंकण समुद्रकिनारा, शैल कळसुबाई सारखे अत्त्युच शिखर, शिलाहार, सातवाहन यांसारखी राजघराणी आणि त्यांचा इतिहास, मुंबईसारखी जगातील व्यवहाराची उलथापालथ करणारी आर्थिक राजधानी आणि जागतिक बाजारपेठ... ही मारुतीरायाच्या शेपटासारखी न संपणारी, एवढ्या प्रसिद्ध, जाज्वल्य आणि वैभवशाली ऐतिहासिक, प्राचीन, धार्मिक इत्यादी स्थळांची यादी राखणाऱ्या महाराष्ट्राला माझा त्रिवार मुजरा...
एखाद्याने लहानपणापासूनच भटकंतीस सुरुवात केली तरीही त्याचे अख्खे आयुष्य कमी पडावे इतुकी पर्यटन स्थळे 'इये महाराष्ट्र देशी' आहेत. परंतु आपणच कपाळकरंटे म्हणून आपण इतकी समृद्ध स्थळे सोडून इतरत्र 'भटकत' बसतो. का व्हावे असे? याचे कारण म्हणजे या स्थळांच्या बाबतीत आपल्याला असणारी अपुरी माहिती आणि त्यांच्या विकासाच्या बाबतीत असणारी शासनासह आपल्या सर्वांचीत उदासीनता.. परंतु मित्रहो, हाही प्रश्न आम्ही चुटकी सरशी सोडवला आहे. 'रॉक क्लाईम्बर्स क्लब' आणि 'गोरिला एडव्हेन्चऱ्स' यांच्या संयुक्त उपक्रमातून आपल्या माय मराठीतील जगातील पहिले गिर्यारोहण आणि पर्यटन विषयक ई-मासिक 'सह्याद्री - कणा महाराष्ट्राचा' या सार्थ नामाभिधानाने आम्ही ०१ मे २०११ रोजी सुरु केले आहे. महाराष्ट्रातील गिर्यारोहण आणि पर्यटनाच्या विकासासाठी वाहिलेले हे मासिक पी.डी.एफ. स्वरुपात असल्याने 'ईको फ्रेंडली' आहेच परंतु संपूर्ण विनामुल्य आहे. हे मासिक मिळवण्यासाठी आम्हाला 'rockclimbersclub@gmail.com' यावर संपर्क साधावा.
माझ्या 'सह्य-भ्रमंती' ह्या ब्लॉगद्वारेसुद्धा मी सह्याद्रीतील माझ्या भ्रमंती विषयीच्या आठवणी आणि किस्से-प्रसंग आपल्यासमोर मांडणार आहे. आपल्याला त्या आवडतील अशी आशा आहे..
चला तर मग.. आपल्या सह्याद्रीतील ह्या अद्भुत प्रवासाला सुरुवात करा, माझ्यासोबत...
धन्यवाद..
उत्कर्ष एरंडकर
+९१-९९३०६०९९९०
utkarsh.erandkar@gmail.com
No comments:
Post a Comment