नोव्हेंबर २०१३ मध्ये केलेल्या मुल्हेर मोरा ट्रेकनंतर निरंजनला कामानिमित्त मुंबईसोडून तळेगाव दाभाडेला शिफ्ट व्हावं लागलं. त्याला नुकतीच मुलगी झाल्याने जबाबदारीही वाढली होती; त्यामुळे नाईलाजाने त्याने मुंबई सोडायचा निर्णय घेतला होता. शेवटी ‘आधी पोटोबा मग विठोबा’ म्हणतात तसंच काहीसं झालं होतं त्याचं. मात्र ‘ना धड पुणे ना धड मुंबई’ अश्या लोकेशनमुळे त्याचं ट्रेकिंग बरंच कमी झालं. त्याउलट मी आणि प्रथमेश इतर मित्रांसोबत बरेच ट्रेक करत सुटलो होतो. ट्रेक झाल्यानंतर निरंजनचा फोन यायचा आणि मी ट्रेकच्या गमतीजमती त्याला सांगत असे. ट्रेकपासून दुरावणं त्याला खूप असह्य झालं होतं हे त्याच्या बोलण्यावरून कळून येत असे पण आमचे ट्रेक्स असे निवडले जात होते की त्याला त्या ट्रेक्सना येणं कठीण असायचं. त्यात कसाबसा जून २०१४ ला इर्शाळगडाच्या ट्रेकला त्याची हजेरी होती. होता होता वर्षं उलटलं आणि २०१५ च्या मार्च मध्ये एक दिवस मला निरंजनचा फोन आला.
“हा.. बोल निरंजन... कसा आहेस...??”
“मी बरा आहे... मला सांग १९च्या रविवारी तू काय करतोयस..??”
“काही नाही... बहुदा घरीच आहे.. का रे?”
“वन डे ट्रेक करूया कोणता तरी?”
“ट्रेक? कोण कोण??”
“तू आणि मी.. दोघेच...”
“दोघेच?? कसं शक्य आहे.. बरं समजा जायचं ठरतंय तर जायचं कुठे? तेही दोघांनाच जमेल असा कोणता ट्रेक आहे?”
“सोंडाई... सोंडाई झालाय का तुझा?”
“सोंडाई? म्म.. नाही रे.. नाही झालाय..”
“तो करूया मग?? काय बोलतो?”
“ठीक आहे.. मी जरा माहिती काढतो मग तुला सांगतो...”
माझा मित्र संभाजी चोपडेकरच्या फेसबुक वॉलवर सोंडाईची माहिती वाचली होती. तो नुकताच तो ट्रेक करून आला होता. मग इंटरनेटवरुन आणखी काही माहिती जमा केली तेव्हा कळलं की एखाद दोन रॉक पॅचेस वगळता ट्रेक तसा सोपा आहे. फक्त खूप आतल्या बाजूला असल्याने तिथपर्यंत जाणं त्रासदायक आहे. लगेच निरंजनला कॉल केला आणि त्याला तिथपर्यंत पोहोचणं ‘कसं करायचं’ ते विचारलं. “तू पनवेलवरून चौकला ये.. मी इथून बाईक घेऊन येतो.. तुला चौकवरून पीकअप करून पुढे जाऊ... काय बोलतो?” मी राहायला सिवूड्सला असल्याने आयडिया झक्कास वाटली. मी तत्काळ होकार दर्शवला आणि २०१५ च्या एप्रिलच्या १९ तारखेला सोंडाईला जायचं ठरलं.
१९ च्या पहाटे तयारी करून मी ‘ईन-टाईम’ पनवेलला पोहोचलो आणि तिथून चौकसाठी टमटम पकडून रवाना झालो. मला एकट्याला प्रवास करायला खूप आवडतं. एकट्याला म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टनी फिरणं खूप आवडतं. गाडीचा चालक, तो जो कोणी असेल तो, गाडी चालवत असतो.. आपण मस्तपैकी खिडकीतून बाहेर डोकाऊन डोंगर-दर्या, वृक्षवल्ली आणि आसमंताचा आस्वाद घेत प्रवास करत असतो. बाजूच्या सीटवर कोणी असला तरी अनोळखी असल्याने तो आपल्या डिस्टर्ब करत नाही त्यामुळे सर्वकाळ खिडकीतून बाहेर ती मजा घेता येते. सोबत एक जरी मित्र असला तरी मग गप्पा होतात आणि या आनंदाला मुकावं लागतं. जवळपास तासाभराच्या त्या प्रवासात, आजूबाजूला दिसून आलेल्या, चंदेरी-म्हैसमाळ, कलावंतिण-प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड या गडांवर नुसत्या नजरेनेच फिरून आलो.



इथे शेवटच्या टप्प्यात एक जोड-टाके दिसून आले. त्यात तळाशी पाणी होते. पण पिता येण्यायोग्य मात्र ते नव्हते. कड्याच्या लहानुल्या सपाटीवर गावातील एक कुटुंब, दरीलगत उभ्या असलेल्या झाडाखाली बसलेलं दिसलं. बहुदा ते गडावरुन जाऊन खाली आले होते. त्यांनी हातात चपला घेतल्या होत्या त्यामुळे आम्ही जवळच थांबलो. ‘कोन-कुठचं’ सवालांची देवाणघेवाण झाली. थोडीफार विचारपूस झाली. त्यांना गड-वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट वाटला नाही पण आम्ही वर जातोय म्हणजे आम्ही देवीचे भक्त वगैरे आहोत अशी त्यांची समजूत झाली. पण शहरातून आलोय हे त्यांनी ताडलं होतं म्हणून ‘चपला हिथंच काढून जावा... सग्ले चपला हिथंच काढून जात्यात..’ हा सल्ला दिला. चपला काढून एवढ्या उन्हात वर चढणार्यांपैकी आम्ही दोघेही नव्हतो; त्यामुळे होकारार्थी मान हलवून तिथेच बसून राहिलो आणि ते लोक जाण्याची वाट बघू लागलो. पण ते काही हलेनात. ते सुद्धा, आम्ही चपला काढून वर जातोय का ते पाहायला थांबलेत असं आम्हाला वाटायला लागलं. ‘आता वर जायचे कसे?’ हा यक्षप्रश्नच होता. पण क्षणात तो प्रश्न सुटला. ती मंडळी उठली आणि आम्हाला ‘रामराम’ करून धारेवरूनच खालच्या कोणत्यातरी गावाच्या दिशेने निघाली. ती दिसेनाशी झाल्यावर आम्ही कड्याला भिडलो. पहिलाच रॉक पॅच पाहून आम्ही चपला काढून वर निघालो नाही या निश्चयाचा आम्हाला अभिमान वाटू लागला. कडा दणदणीत तापला होता आणि अनवाणी निघालो असतो तर तापलेल्या तव्यावर पाय ठेवावा अशी स्थिति झाली असती. तो कडा चढायला अगदी कठीण नव्हता पण नवखा माणूस तिथून खाली नक्कीच फेकला गेला असता. तो कडा पार करून आम्ही पुढे गेलो. पुढे खडकात खोदलेल्या पायर्या किंवा खोबणीवरून आम्ही वरच्या टप्प्यात आलो. इथेही दोन उत्तम खणलेली पण आता सुकी असणारी दोन टाकी दिसून आली आणि समोर एका खणखणीत लोखंडी शिडीने आमचे स्वागत केले. ती शिडी नुकतीच बसवण्यात आलेली वाटत होती. जवळपास ६० फुटांच्या कड्यावर ती बसवलेली होती. तिच्या मागे जुन्या खोबण्या दिसून येत होत्या आणि जर शिडी नसती तर आम्हाला इथूनच परत जावं लागलं असतं याची जाणीव त्या करून देत होत्या. मोठ्या दिमाखात आम्ही शिडी चढून वर आलो.
No comments:
Post a Comment